सरकारने कितीही प्रयत्न केले, तरी ‘आमचे वाकडे ते वाकडेच’, भाजीमंडईत तुफान गर्दी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
करोना संसर्ग रोखण्यासाठी स्थानबद्ध होणे हा एकमेव मार्ग असताना त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने जमावबंदी लागू केली. त्याचा सुध्दा काही फरक पडत नसल्याने सोमवारी (दि. 23) सायंकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली.
संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी यातून जीवनावश्यक वस्तू आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’चे भान पाळत भाजीपाला खरेदीला सूट देण्यात आली आहे. पण लोक भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून सुरक्षेच्या कोणत्याच नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. सकाळपासूनच पिंपरी भाजीमंडई आणि चिंचवड भाजीमंडई मध्ये लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसून आले.
संचारबंदीला न जुमानता नागरिक गाडी घेऊन बाहेर पडत आहेत व भाजी मंडईमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. बेकरी, दुधाची दुकाने, किराणा दुकानात सुद्धा लोक गर्दी करत आहेत. त्यामुळे संचार बंदीचे गांभीर्य लोकांना आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.