सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको; आमदार रोहित पवारांची टीका
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी देशात सध्या भीतीचे वातावरण तयार झाले असून लोक सरकारवर टीका करण्यास घाबरत आहेत असं परखड मत व्यक्त केलं आहे. यानंतर सगळीकडे राहुल बजाज यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील आपलं मत मांडलं असून आपल्यावरील टीका देखील न ऐकून घेण्याच्या या सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको अशी भीती व्यक्त केली आहे.
रोहित पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “राहुल बजाज यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी उद्योगपतींना आपल्या केंद्र सरकारची भीती वाटत असेल तर नक्कीच ही चिंताजनक बाब आहे. केंद्र सरकारमधील मंत्री सांगत आहेत, त्याप्रमाणे बहुतेक तुम्ही चांगलं काम करत देखील असाल पण उद्योगधंद्यांची वस्तुस्थिती वेगळी आहे. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच उद्योगधंद्यांच्या खऱ्या समस्या माहीत आहेत, आपल्या अनुभवाच्या जोरावर या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय देखील हे लोक सुचवू शकतात”.
पुढे त्यांनी बोललं आहे की, “सरकार आणि उद्योगपती यांच्यात जर चांगला संवाद असेल, धंद्यासमोरच्या खऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याची सरकारची तयारी असेल तर देशाच्या आर्थिक विकासाला नक्कीच गती मिळू शकते पण यासाठी गरज आहे ती उद्योगपतींशी संवाद साधण्याची, त्यांची बाजू ऐकून घेण्याची. मला एकच भीती वाटते ती म्हणजे, आपल्यावरील टीका देखील न ऐकून घेण्याच्या या सरकारचा अहंकारी स्वभाव आपल्या देशालाच घेऊन बुडायला नको”.