सत्तेचा गैरवापर करुन अनेकांना आपल्याकडे ओढून घेवू लागलेत – शरद पवार
पुणे – राष्ट्रवादी पक्षाने अशी परिस्थिती पहिल्यांदाच पाहिलेली नाही, यापूर्वीही अशी परिस्थिती आली होती. पण या परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे, त्यामुळे कसलीही भीती नाही, तसंच सत्तेचा गैरवापर करुन अनेकांना ओढून घेत आहेत, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवरही निशाणा साधलाय.
राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, माझ्या दृष्टीने सध्या काही घडत नाही. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याशिवाय आपलं निवडून येणं शक्य नाही, अशी भीती मनात असणारा वर्गच अस्वस्थ आणि अस्थिर झाला आहे.
आयकर विभागाची आणि ईडीची भीती दाखवली जात असल्याचं आमच्या काही नेत्यांनी मला सांगितलं. याचं उदाहरण कोल्हापुरात दिसलं. ते (हसन मुश्रीफ) भाजपात येणार नाही म्हणताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकण्यात आल्या. सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचं आपल्यासमोर आहे, असंही शरद पवार म्हणाले.
पक्षाचं म्हणायचं तर मला याची थोडीही चिंता वाटत नाही. 1980 मध्ये आमचे 60 लोक निवडून आले. मी 15 दिवस परदेशात होतो, त्यादरम्यान आमचे सर्व लोक फोडले. मी देशात परतलो तेव्हा आमच्याकडे फक्त 6 आमदार शिल्लक होते. पण तेव्हाही मला चिंता नव्हती. कारण त्यानंतरच्या निवडणुकीत जे आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले आणि पुन्हा आमचे 60 आमदार निवडून आले. त्यामुळे हे सर्व आम्ही अनुभवलंय, त्याला कसं उत्तर द्यायचं हे ही आम्हाला ठाऊक आहे आणि पुन्हा पक्ष कसा उभा करायचा याचीही आम्हाला काळजी आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.