सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक
मुंबई : महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कालपासून दिल्लीत लागोपाठ बैठका सुरु आहेत. आजही आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठका सुरु आहेत. या चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. काल (20 नोव्हेंबर) काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचं मिळून सरकार येईल, असे सांगितले होते.
आज पुन्हा एकदा हे दोन्ही नेते माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सांगितले की, “उद्या मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होईल” त्यामुळे सत्तास्थापनेसंबंधीची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे बोलले जात आहे. उद्या (22 नोव्हेंबर)संध्याकाळी 4 वाजता काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांची निवडदेखील केली जाणार आहे.