संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज भारत-चीन तणावाबाबत संसदेत माहिती देणार
नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये अनेक महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणाव सुरू आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही भारत-चीन सीमेवरील संघर्ष दूर झालेला नाही. आता सरकारने या विषयावर अधिकृत निवेदन देण्यासाठी विरोधकांचा दबाव आहे. यानुसार देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे ‘लडाखमधील सीमेवरील परिस्थिती’बाबत आज दुपारी तीन वाजता लोकसभेत माहिती देणार आहेत.
१५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे ४० हून अधिक सैनिक ठार झाले. त्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने असून भारत-चीन सीमेवर तणाव कायम आहे. सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसने लडाखमधील घुसखोरीच्या मुद्यावर चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर आज राजनाथ सिंह लडाख सीमेवर नेमकी काय परिस्थिती आहे याबाबत लोकसभेत माहिती देतील. महत्त्वाचे म्हणजे हे पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवरील सीमावादासंदर्भात भारत सरकारचे पहिले अधिकृत वक्तव्य असेल.
दरम्यान, काल संसदेत प्रवेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले की, ‘संपूर्ण देश सैनिकांच्या मागे उभा आहे, असा स्पष्ट संदेश संसदेचे सर्व सदस्य देतील असा आपल्याला विश्वास आहे.’