संभाजी महाराजांच्या आक्षेपार्ह पुस्तकाबाबत समितीची स्थापना
पुणे – एकभाषिक पुस्तकांच्या योजनेमधील लाखो प्रकाशन, नागपूर यांच्या ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकामधून ‘संभाजी राजांची बदनामीकारक मजकूरावर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच प्रतिभा प्रकाशनाच्या, श्री.गोविंद तळवळकर लिखित ‘संतांचे जीवन प्रसंग’ या पुस्तकामधून संत तुकाराम व त्यांच्या पत्नीसंबधी अवमानकारक मजकूर असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
सद्यस्थितीत सदर आक्षेपांबाबत निर्णय होईपर्यंत सदर पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी वितरीत करण्यात येऊ नयेत याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) तर्फे सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. शासन महापुरुष व संतांविषयी अवमानकारक उल्लेख असल्याबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत गंभीर आहे. यासाठी या आक्षेपांच्या पडताळणीसाठी, इतिहास तज्ञांची समिती नेमून, सदर पुस्तकांचे परीक्षण करून, समितीचे अभिप्रायावर आधारित, सदर पुस्तकांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.
यासाठी सदर पुस्तकांचे परीक्षण करण्यासाठी खालील तीन तज्ञ सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात येत आहे. या समितीच्या अध्यक्ष पदी डॉ.सदानंद मोरे, तर म्हणुन सदस्य श्री.पांडुरंग बलकवडे डॉ.गणेश राऊत याची नेमणुक केली आहे. या समितीस ७ दिवसात देण्यात आलेल्या पुस्तकांचे परीक्षण करून त्यावरील मत अहवाल स्वरुपात शासनास देणार आहे, त्यानंतर सदर पुस्तकांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईल.