संजय राऊत म्हणाले – बाबरी तोडणारे आम्हीच आहोत, ती आम्हाला काय म्हणतेय?
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटच्या मुंबईविषयीच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आज ती मुंबईत आली दरम्यान ती येण्यापूर्वीच तिच्या कार्यालयाची बीएमसीने अनधिकृत ठरवून तोडफोड केली. यानंतर तिने शिवसेनेची तुलना बाबरी सेनेशी केली. यावर संजय राऊतांनी तिच्यावर पटलवार केला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये राऊतांनी हे भाष्य केले आहे.
संजय राऊत आजच्या कंगनाविषयीच्या घडामोडींवर बोलताना म्हणाले की, ही सरकारची कारवाई आहे. या कारवाईचा माझ्याशी काहीच संबंध नाही. तसंच कंगनाने शिवसेनाला बाबराची सेना म्हटलेय. पण बाबरी तोडणारे आम्हीच आहोत. ती आम्हाला काय म्हणतेय? असा टोलाही राऊतांनी तिला लगावला आहे.
यावेळी राऊतांना कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईच्या टायमिंगविषयीही प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना राऊत म्हणाले की, कारवाईच्या टायमिंगबाबतचे उत्तर केवळ मुंबई महापालिकेचे आयुक्त देऊ शकतील. जर कोणी कायदा मोडत असेल तर त्यावर कारवाई केली जाते. यावेळी पक्षाकडे याविषयी माहिती असणे आवश्यक नसल्याचंही राऊत म्हणाले आहेत.
यासोबतच शिवसेनेने सूडाच्या भावनेती कंगनाविरोधात कारवाई केल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ही कारवाई सूडाच्या भावनेतून करण्यात आलेली नाही. दरम्यान मुंबई महापालिकेच्या कारवाईचे प्रकरण आता उच्च न्यायालयाच गेले आहे. तिथेच पालिका उत्तर देईल असंही स्पष्टीकरण राऊतांनी दिलं आहे.