श्रीलंकेला विजय अनिवार्य
आज वेस्ट इंडिजविरुद्ध सामना
गणितीय समीकरणांआधारे श्रीलंकेचे विश्वचषकामधील आव्हान अद्याप जिवंत आहे. त्यामुळे सोमवारी श्रीलंकेला उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विजय अनिवार्य असेल.
कामगिरीत सातत्याचा अभाव असलेल्या श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध २० धावांनी विजय मिळवून बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. परंतु पुढच्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यामुळे त्यांच्या वाटचालीला मोठा धक्का बसला आहे.
१९९६ मधील विश्वविजेता श्रीलंकेचा संघ सामन्यांमध्ये सहा गुण मिळवून गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य उर्वरित दोन सामन्यांमधील विजयांसह पाकिस्तान आणि इंग्लंडच्या कामगिरीवरसुद्धा अवलंबून राहणार आहे.
आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या आव्हानात्मक गोलंदाजीच्या माऱ्यापुढे त्यांचा कस लागणार आहे. परंतु वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या अनुभवी गोलंदाजीच्या माऱ्याने त्यांना बऱ्याचदा तारले आहे. न्यूवान प्रदीपने आजारपणामुळे माघार घेतल्याने मलिंगावरील जबाबदारी वाढली आहे.
जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजचा संघ उर्वरित दोन सामन्यांत पत राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. पाकिस्तानविरुद्ध सात गडी राखून दणदणीत विजय मिळवणाऱ्या वेस्ट इंडिजला त्यानंतर आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही.
विजयाची ‘सत्ता’ कुणाची?
चालू विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील शेवटचे सात साखळी सामने बाकी आहेत. योगायोगाने सोमवारी श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात विश्वचषकामधील सातवी लढत होत आहे. यापैकी वेस्ट इंडिजने चार सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. ब्रायन लाराने १९९० ते २००७ अशा १७ वर्षांच्या कारकीर्दीत २९९ एकदिवसीय सामन्यांत १९ शतकांसह १०,४०५ धावा केल्या आहेत. लाराला मागे टाकण्यासाठी ख्रिस गेलला फक्त ५४ धावांची गरज आहे. गेलने १९९९पासून आतापर्यंतच्या २० वर्षांच्या कारकीर्दीतील २९६ एकदिवसीय सामन्यांत १०,३५१ धावा केल्या आहेत. उपल चंदनाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सात हजार धावा पूर्ण करण्यासाठी अजून ४९ धावांची गरज आहे. हा टप्पा गाठणारा तो श्रीलंकेचा आठवा खेळाडू ठरेल.