श्रीदेवींचा कट रचून खून करण्यात आला; माजी एसीपीचा दावा
नवी दिल्लीः बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूभोवतीचे गूढ आता आणखी वाढले आहे. श्रीदेवींचा मृत्यू अपघाती किंवा आकस्मिक नव्हता, तर कट रचून त्यांचा खून करण्यात आला, असा खळबळजनक दावा दिल्लीतील एका माजी पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. वेद भूषण असे त्यांचे नाव असून ते सध्या खासगी तपास संस्था चालवतात.
श्रीदेवींचा मृत्यू ज्या खोलीत झाला, त्या खोलीत जाण्यास पोलिसांनी नकार दिल्याने वेद भूषण यांना त्याच्या शेजारच्या खोलीत मुक्काम केला होता. त्या रात्री श्रीदेवी यांच्या खोलीत काय घडले असेल, कसे घडले असेल, हा प्रसंग त्यांनी अगदी बारकाईने तपासून पाहिला. त्यावरून, या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल असल्याचा त्यांना दाट संशय वाटत आहे. याबाबतचे वृत्त ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिले असून, श्रीदेवींच्या मृत्यूशी संबंधित अनेक प्रश्नांची समर्थनीय उत्तरंच मिळत नसल्याचे वेद भूषण यांनी म्हटले आहे.
दुबईतील जुमेरा एमिरेट्स टॉवर्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये 24 फेब्रुवारीच्या रात्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छवास थांबेपर्यंत त्याला बाथटबमध्ये बळजबरी बुडवून धरणे शक्य आहे. त्यात फारसा कुठलाच पुरावा मागे उरत नाही आणि हे सगळेच कसे अपघाती होते, हे सहज भासवता येते. तसेच काहीसे श्रीदेवींच्या बाबतीतही झाले आहे. हा ठरवून केलेला खून आहे, असे वेद भूषण यांचे म्हणणे आहे.