शेतातील जळाऊ कचऱ्यामुळेच दिल्ली प्रदूषित!
पंजाब आणि हरियाणा राज्यांतीत शेतात जाळल्या जाणाऱ्या गहू आणि भाताच्या पेंढय़ांमुळेच दिल्लीतील प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. शुक्रवारी दिल्लीतील प्रदूषणाची पातळी २११ इतकी नोंदविण्यात आली. ही प्रदूषणाची तीव्र पातळी मानली जाते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
हार्वर्ड विद्यापीठ आणि नासा यांनी गेल्या वर्षी केलेल्या संशोधनानुसार, दिल्लीतील ५० टक्के प्रदूषणास शेजारच्या राज्यांतील शेतात जाळला जाणारा कचरा कारणीभूत आहे. साधारणत: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पिकांतून धान्य बाजूला काढल्यानंतर पेंढय़ा एकत्र करून जाळल्या जातात.
दिल्ली सरकारने राबविलेल्या विविध हरित कार्यक्रमांमुळे यंदा येथील प्रदूषणाच्या पातळीत २५ टक्क्य़ांपर्यंत घट झाली होती. मात्र, ऑक्टोबरपासून प्रदूषणाची पातळी पुन्हा तीव्रतेने वाढत असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.
दंडआकारणी नाही
हरियाणा आणि पंजाब सरकार शेतकऱ्यांना अत्याधुनिक अवजारांसाठी ५० ते ८० टक्के अनुदान देते. त्याशिवाय आधुनिक शेतीबाबत वेळोवेळी जागृतीही केली जाते. मात्र, तेथील शेतकरी पारंपरिक पद्धतीच अवलंबत असल्याने राष्ट्रीय हरित लवादाने संबंधित शेतकऱ्यांना दंड आकारण्याचे आदेश २०१५ साली दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली दिसून येत नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.