शेतकरी आंदोलन चिघळले : येत्या ८ डिसेंबरला भारत बंदची हाक!
नवी दिल्ली । टीम ऑनलाईन
मागील अनेक दिवसांपासून नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब-हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. कृषी कायदा मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात एल्गार दिला आहे.
शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये अनेकदा बैठक होऊनही कोणताही ठोस थोडगा अद्याप निघालेला नाही. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत. कृषी कायदे त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शेतकरी नेते हरविंदरसिंग लखोवाल म्हणाले की, शेतकरी विरोधी कायदे 5 डिसेंबरपूर्वी रद्द करा नाहीतर देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळले जातील असा इशारा आम्ही सरकारला दिला होता. पण अजूनही सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नाहीय. त्यामुळे आता आम्ही 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा करत आहोत.
काल देखील दिल्लीत विज्ञान भवनमध्ये शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये अनेक तास चर्चा झाली. मात्र कोणताही ठोस निर्णय झाला नाही. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारने दिलेले अन्न व जेवण देखील नाकारले. उद्या उद्या शेतकरी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधीमध्ये पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.