शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सायकल जथ्था व कोपरा सभांचे आयोजन
– कामगार संघटना संयुक्त कृती समिती व जन आंदोलनांची संयुक्त कृती समितीचा निर्णय
– पुणे ते मुंबई पर्यंत कामगार होणार सहभागी
पिंपरी | प्रतिनिधी
शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शहरात सायकल जथ्था व कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार संघटना संयुक्त कृती समिती व जन आंदोलनांची संयुक्त कृती समितीने बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी (दि. २०) पुणे सोलापूर रस्त्यावरील यवत येथून हा जथा निघणार आहे. कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे एकूण प्रमुख कार्यकर्ते डॉ कैलास कदम आणि कॉ अजित अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली हा जत्था निघणार आहे. त्याच्या तयारीसाठी गेले आठवडाभर या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी चालू आहेत. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीने दिली.
डॉ. कैलास कदम, डॉ. सुरेश बेरी, कॉ. अजित अभ्यंकर, अनिल रोहम, वसंत पवार, गणेश धराडे, सचिन कदम यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुंबई येथील राजभवन समोर कामगार – शेतकरयांच्या वतीने महामुक्काम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुणे, रांजणगाव, चाकण, पिंपरी चिंचवड आणि तळेगाव एमआयडीसी येथील कामगार सायकल जत्था घेउन मुंबईत दाखल होणार आहेत. हा जत्था बुधवारी (दि. २०) सकाळी पुणे सोलापूर रस्त्यावरील यवत येथून निघणार आहे. त्या दिवशी दिवसभर चौफुला (सोलापूर रस्ता ), न्हावरे सांगावी ( शिरूर रस्ता), कोरेगाव या ठिकाणी सभा होणार आहेत. रात्री रांजणगाव गणपती येथे जत्थ्याचा मुक्काम असणार आहे. गुरुवारी (दि. २१) रंजनगाव एमआयडीसी, शिक्रापूर, मेंद्नकर वाडी ( शक्रापूर चाकण रस्ता ) आणि चाकण येथ सभा होउन चाकण येथेच मुक्काम करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. २२) चाकण एमआयडीसी परिसरात सभा घेण्यात येणार आहे. शेवटी आकुर्डी येथे मुक्काम होईल. २३ जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड परिसरात निगडी, आकुर्डी येथे सकाळी सभा घेण्यात येणार आहे. दुपारी तळेगाव परिसरात सभा होउन लोणावळा येथे रात्री मुक्काम करण्यात येईल. २४ जानेवारी रोजी जत्था मुंबई दिशेने निघणार आहे.
पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात प्रामुख्याने हिंद कामगार संघटना, महिला मजदूर संघटना, आयटक, श्रमिक एकता महासंघ, लोकजागर ग्रुप, डीवाय एफ आय, सीटू, अंधश्रद्धा निमूर्लन समिती, भारतीय जनसंसद यांचा प्रामुख्याने सहभाग आहे. सचिन देसाई, सुधीर मोरुडकर, एकनाथ पाठक, संजय बारी, मनोहर पद्मन, गोकुळ बंगाळ, अनिल रोहम, सचीन कदम, राम नलावडे, राजू जाधव, हे या अभियानात परिश्रम घेत आहेत.