शेकापच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढवा, राजू शेट्टीना कार्यकर्त्यांचा आग्रह
आमदार गणपतराव देशमुख यांचा खरा वारसदार म्हणून राजू शेट्टींची सांगोल्यात चर्चा
पुणे |महाईन्यूज |प्रतिनिधी|
253 सांगोला विधानसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 55 वर्ष विधानसभेचा प्रतिनिधीत्व करणारे आमदार गणपतराव देशमुख यांनी वाढते वय अन्ं प्रकृती अस्वस्थामुळे विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली. यामुळे त्याच्या विचाराचा आणि तत्वाशी बांधिल असणा-या वारसदार कोण? याचा शोध सुरु आहे. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांचे खरे वारसदार होवू शकतात. सध्यस्थितीत शेतकरी, कामगार, शेतमजूर, कष्टकरी यांच्यासह वंचित घटकातील सर्वसामान्य नागरिकांना शेट्टी हेच न्याय देवू शकतात, असा मतप्रवाह ‘शेकाप’च्या कार्यकर्त्यांमध्ये असून शेट्टी यांची भेट घेऊन सांगोल्यातून लढावे, असा आग्रह धरण्यात येवू लागला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील परंपरागत दुष्काळी म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. या विधानसभा मतदारसंघातून १९६२ पासून शेकापचे गणपतराव देशमुख हे ५५ वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. १९७२ आणि १९९५ ची निवडणूक वगळता ते सलग निवडून येत आहेत. १९७२ मध्ये कै. काकासाहेब साळुंखे-पाटील आणि १९९५ साली काॅंग्रेसकडून शहाजीबापू पाटील निवडून आले होते. तर १९७२ मधील पोटनिवडणूकीत पुन्हा गणपतराव देशमुख निवडून आले होते. सर्वाधिक काळ आमदार म्हणून राहण्याचा विक्रम गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. आता देशमुख हे ९४ वर्षांचे असून त्याचे शरीर देखील साथ देत नसून ऐकण्यासही कमी येत आहे. तरीही देशमुख यांनीही आजपर्यंत सर्वसामान्य वर्गाचे नेतृत्व करुन जनतेच्या मनावर अधिराज्य केलं.
विधानसभा निवडणूकीत सांगोल्यातून शेकापचाच आमदार निवडून यावा, तसेच प्रकृती अस्वस्थामुळे आता नव्या नेतृत्वाकडे धूरा सोपविणार असल्याचं गणपतराव देशमुख यांनी जाहीर केले. कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरीही त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वाचा शोध सुरु झाला आहे.
शेतकरी, कष्टकरी, कामगार, शोषित, वंचित घटकांचे नेतृत्व सर्वमान्य असणारा नेता म्हणून राजू शेट्टी यांच्याकडे पाहिले जाते. तसेच विचारांशी, तत्वाशी बांधिलकी, जनतेच्या प्रश्नांची नाळ असणारा नेता म्हणून पाहिलं जातं. यामुळे ते गणपतराव देशमुख यांचा वसा आणि वारसा चालवू शकतात. यामुळे शेट्टी यांनी सांगोल्यातून निवडणूक लढविण्याचा आग्रह शेकापकडून करण्यात येवू लागला आहे. याकरिता शेकापचे कार्यकर्ते शिरोळला येवून राजू शेट्टीची भेट घेवून तसा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबत शेट्टी यांनी अजून होकार दर्शविलेला नाही.