शिवसेनेने ठरविल्यास राज्याला पर्यायी सरकार देऊ – नवाब मलिक
मुंबई – राज्यात भाजप आणि शिवसेनेतील सत्तासंघर्ष अजूनही संपलेला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युलावर अडून बसलेल्या शिवसेना आणि भाजपत आता कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे सांगण्यात येते.
राज्यातील राजकीय परिस्थिती दोलायमान अवस्थेत आहेत. त्याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मोठे आणि महत्वाचे वक्तव्य केले आहे. राज्यावर राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ देणार नाही. शिवसेनेने ठरवल्यास राज्याला पर्यायी सरकार देऊ. शिवसेनेने निर्णय घ्यावा, असे मलिक यांनी म्हटले.
मलिक पुढे म्हणाले की, भाजपकडून वारंवार शिवसेनेचा अपमान केला गेला. शिवसेनेने ठरवल्यास राज्याला पर्यायी सरकार देऊ. त्यांचा निर्णय झाल्यास राज्याला नवे सरकार मिळेल.
राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी राज्यपालांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी संकटात आहे, त्यासाठी उपाय योजना करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ‘एबीपी माझा’शी ते बोलत होते.