शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार
मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला काल सायंकाळ साडेसात पर्यंत राज्यात सत्ता स्थापन करण्यास निमंत्रीत केले होते. मात्र, सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ वाढवून देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने राज्यपालांकडे केली. ही मागणी राज्यपाल कोश्यारी यांनी फेटाळून लावली होती. त्यामुळे राज्यपालांच्या या निर्णयाला शिवसेनेने आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. यावर उद्या सकाळी 10.30 वा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची कोर्टात धाव घेतली आहे.
दरम्यान, शिवसेना काल सत्तेचा दावा दिलेल्या मुदतीत करण्यात अपयशी ठरली. शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपणास सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी राज्यपालांनी फेटाळून लावत रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकार स्थाण्यासाठी निमंत्रण दिले. मात्र, आज दुपारी राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्याचे वृत्त अनेक वृत्त वाहिन्यांनी प्रसिद्ध केले. हे वृत्त ताजे असतानाच शिवसेनेने आपणास सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे सांगत राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.