शिवसेना खासदारामूळे ‘पदमजी मिल’ कामगारांसह कुटूंबे रस्त्यावर येतील
माजी नगरसेवक संतोष बारणे यांची टीका
पिंपरी |महाईन्यूज|
थेरगावातील पदमजी पेपर मिलमुळे प्रदूषण वाढल्याची तक्रार करत कारवाई करा, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. मात्र, कंपनीतील शेकडो कामगारासह त्यांच्या कुटूंबाचा कोणताही विचार त्यांनी केला नाही. केवळ कंपनीतील आगामी भरती प्रक्रिया डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही तक्रार केल्याचा आरोप माजी नगरसेवक संतोष बारणे यांनी गुरुवारी (दि.29) पत्रकार परिषदेत केला.
खासदार श्रीरंग बारणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे ही तक्रार केली होती. पदमजी पेपर मिल पहिल्यापासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करत आहे. पवना नदीत प्लांटचे रसायनमिश्रित पाणी सोडले होते. प्रदूषण करणाऱ्या या कंपनीवर तत्काळ कारवाई करावी आणि कंपनीतील बॉयलर प्लांटची चौकशी करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, याबाबत संतोष बारणे यांनी थेरगावातील काही स्थानिक नागरिकांसमवेत खासदारांची भूमिका अयोग्य असल्याचे म्हटले.
कित्येक वर्षापासून ही कंपनी या ठिकाणी आहे. या कंपनीत सद्यस्थितीत सातशेहून अधिक कामगार काम करतात. खासदार बारणे यांनी कंपनी व्यवस्थापन, तेथील कामगारांशी संवाद साधून चर्चा करायला हवी होती. प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्यास कंपनीला भाग पाडायला हवे होते. परंतु, त्यांनी थेट कंपनीची तक्रार केली. त्यामुळे उद्या कंपनी बंद झाल्यास या शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. याचा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी आता अचानकपणे या कंपनीबाबत ही भूमिका घेतली. कंपनीत आगामी काळात भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे त्यांनी ही तक्रार केल्याचा आरोप देखील बारणे यांनी केला आहे. या संदर्भात खासदारांशी सपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.