शालेय अभ्यासक्रमात आणि शाळांमधील तासिकांमध्ये कपात करण्यात येणार ?
देशभरात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आगामी शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रमात आणि शाळांमधील तासिकांमध्ये कपात करण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.
“सध्याची परिस्थिती पाहता आणि शिक्षक व पालकांकडून आलेल्या मोठ्या प्रमाणवरील मागणीचा विचार करता, आम्ही येत्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात व तासिकांमध्ये कपात करण्याच्या पर्यायावर विचार करत आहोत”. असं पोखरियाल यांनी सांगितलं आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या व परिक्षांना स्थगिती देण्यात आली होती. तर, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाउनचा पाचवा टप्पा एक जूनपासून सुरु झाला आहे. या पाचव्या टप्प्यामध्ये अनेक सेवा पुन्हा सुरु करण्यासंदर्भात काही अटी आणि शर्थी ठेवत परवानगी देण्यात आली आहे.
या अगोदर शालेय शिक्षण सचिव अनिता करवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्यांच्या शिक्षण सचिवांनी विद्यार्थांच्या आरोग्य व सुरक्षा, शाळांमधील स्वच्छता संबंधी उपाय आणि ऑनलाइन व डिजिटल शिक्षणाशी निगडीत मुद्यांवर सोमवारी चर्चा केली होती.