शहरातील नागरिकांनी ‘कोरोना’ या विषाणूपासून दूर राहण्यासाठी गर्दी टाळावी – संतोष सौंदणकर
– चिंचवडगावातील गुरुकृपा सोसायटीत कोरोना या विषाणूरुपी राक्षसाचे दहन
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
चिंचवडगावातील गुरुकृपा सहकारी गृहरचना संस्थेने अनोखा पायंडा पाडत जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना या विषाणूरुपी राक्षसाचे इमारतीच्या आवारात होळी पेटवून दहन केले. यावेळी ‘पर्यावरण वाचवा, परिसर वाचवा’ चा संदेश देण्यात आला. होळीसाठी लाकडांचा वापर न करता शेणापासून बनविलेल्या गौऱ्यांचा होळी पेटविण्यासाठी वापर करण्यात आला. तसेच, सोसायटीतील रहिवाशांनी भारतासह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना हा नरसंहारक विषाणू नष्ट व्हावा, अशी प्रार्थना होलीका मातेला केली.
यात शिवसेनेचे शहर संघटक संतोष सौंदणकर, कल्याण चट्टे पाटील यांनी पुढाकार घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित डोईफोडे, किसन इळवे, मारुती केवळे, दत्तात्रय मोशीकर तसेच सुनिता डोईफोडे, रेश्मा सौंदणकर, दिपाली सुतार, सुनिता चट्टे पाटील, सायली गांगण, प्राजक्ता धडफळे, चंद्रकला कदम, रूपाली बुचडे व इतर सदस्य उपस्थित होते.
संतोष सौंदणकर म्हणाले की, हिंदू धर्म आणि संस्कृतीत सण-उत्सव, परंपरा यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. निसर्गाच्या कालचक्रानुसार अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. होळी हा आपल्याकडील एक महत्त्वाचा सण आहे. मात्र या सणावर कोरोनारुपी राक्षसाचे सावट आहे. जगभरात या विषाणूने हाहाकार माजविला आहे. पुण्यातही काहींना या विषाणूची लागण झालेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी या विषाणूपासून दूर राहण्यासाठी गर्दी टाळावी. तसेच या विषाणूपासून शक्य होईल तेवढी जनजागृती देखील करावी.
तसेच, आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावे, हाच मुळात होळी साजरा करण्यामागचा उद्देश आहे. आपल्या जीवनात रंग आहेत, म्हणून आनंद, ऊर्जा, उत्साह, चैतन्य आहे. त्यातून निर्माण होणारी सकारात्मक भावना मांगल्यकारक अशीच असते. याच भावनेतून होळीच्या दिवशी सर्वत्र रंगाची उधळण केली जाते. मात्र, सर्वचजण पाणीसंकटाकडे देखील सोयीस्कर दुर्लक्ष करतात. त्यामुळे रंग खेळताना शहरातील नागरिकांनी लागू असणाऱ्या दिवसाआड पाणी टंचाईचे देखील भान ठेवावे. या सोसायटीतील नागरिकांनी यावर्षी रंगांची उधळण करताना पाण्याचा अत्यंत कमी वापर तसेच नैसर्गिक रंगाने होळी खेळण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यामुळे शहरातील इतर सोसायटी व नागरिकांनी या सोसायटीचा आदर्श घ्यावा व त्याप्रमाणे आचरण करावे, असे आवाहन यावेळी सौंदणकर यांनी केले.