शहरांना होणारा शेतमाल आजपासून अडविणार
- शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करणार
येत्या रविवारी राज्यात चक्काजाम आंदोलन
पुणे – शेतमालास हमीभाव, सरसकट कर्ज आणि वीज बिलमुक्ती आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी दि. 1 जूनपासून देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून आता शहरांकडे येणारा शेतमाल अडविणार असल्याची माहिती किसान संघर्ष समितीचे सदस्य विठ्ठल पवार यांनी दिली. नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल बाजारात विक्रीसाठी पाठवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संप शुक्रवारपासून (दि. 8) अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
सध्या राज्यात विविध ठिकाणी शेतकरी संप सुरू आहे. संपास 7 दिवस उलटले असून, अद्यापही मागण्यांसदर्भात योग्य तो निर्णय झालेला नाही. त्यामुळे, आजपासून संघटनांनी लढा तीव्र केला आहे. परिणामी, पुढील 3 दिवस शेतमाल विक्रीसाठी पाठवू नये. शेतमाल वेळेवर न पोहोचल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी पुढील 3 दिवस शेतकरी संपामध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांची ताकद दाखविणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, येत्या रविवारी (दि. 10) राज्यातील विविध 60 ते 70 ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय किसान महासंघ, शरद जोशी विचारमंच, शेतकरी संघटना, प्रहार संघटना, मराठा सेवा संघ, किसान सभा, किसान क्रांती व अन्य संघटनांनी हे आंदोलन पुकारले आहे.
- पुण्यात शनिवारी रास्ता रोको
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता समितीच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवारी (दि. 9) सकाळी 11 वाजता येथील मजूर अड्ड्यातील हुतात्मा स्मारकापासून हा मोर्चा काढून सिटी पोस्ट चौकात रास्ता रोको करण्यात येणार आहे. यामध्ये, शहरातील वकील, अध्यापक, डॉक्टर, सामाजिक नेते, साहित्यिक, कष्टकरी आदी सहभागी होणार आहेत. पोलिसांना परवानगी नाकारल्यास सत्याग्रही अटकही करवून घेतील, अशी माहिती ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिली.