शस्त्र निर्यातीमध्ये भारत २३ व्या स्थानी…
शस्त्रांची आयात न करता आपण जास्तीत जास्त निर्यात केली पाहिजे. मेक इन इंडिया मोहिमेमागे मोदी सरकारचा हाच उद्देश आहे. पण सध्याच्या घडीला शस्त्रास्त्रांची आयात करणाऱ्या देशांमध्ये भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. दिलासा देणारी बाब इतकीच आहे की, जगातील २५ आघाडीच्या शस्त्र निर्यातदार देशांमध्ये आपण २३ व्या स्थानी आहोत.
शस्त्रास्त्र विक्रीच्या जागतिक व्यापारामध्ये ०.२ टक्के इतकाच आपला वाटा आहे. म्यानमार, श्रीलंका आणि मॉरिशेस हे आपले सर्वात मोठे ग्राहक आहेत. स्टॉकहोल्म इंटरनॅशनल पीस रिसर्च संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. २०१५ ते २०१९ या काळात सौदी अरेबियाने सर्वाधिक १२ टक्के शस्त्रास्त्रांची आयात केली. त्याखालोखाल भारत ९.२ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
चीन ४.३ टक्क्यांसह पाचव्या तर पाकिस्तान २.६ टक्क्यांसह ११ व्या स्थानावर आहेत. सर्व महत्वाची शस्त्रास्त्रे स्वत: विकसित करण्याचे भारत आणि पाकिस्तानचे उद्दिष्टय आहे. पण सध्या तरी दोन्ही देशांना आयातीवरच अवलंबून रहावे लागत आहे. भारताने केलेला बालाकोट एअर स्ट्राइक त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने दिलेले प्रत्युत्तर, यावेळी दोन्ही देशांनी परदेशी शस्त्रास्त्रांचाच वापर केला.
भारताने रशियन बनावटीची सुखोई-३० एमकेआय, फ्रान्सची मिराज-२०००, इस्रायली स्पाइस २००० बॉम्ब आणि स्वीडीश बनावटींच्या बोफोर्स तोफांचा वापर केला. त्याचवेळी पाकिस्तानने प्रत्युत्तर अमेरिकन बनावटीची एफ-१६, चीनचे जेएफ-१७ आणि स्वीडीश अॅवॉक्स विमानांचा वापर केला. २०१० ते २०१९ या काळात भारताने रशियाकडून सर्वाधिक शस्त्रास्त्रे विकत घेतली.