शवागारात शीतपेटी नसल्याने मृतदेहासह नातेवाईकांची सात तास फरफट
विरार | महाईन्यूज
वसई-विरार शहरात शवागारात पुरेशा शीतपेटय़ा नसल्याने मृतदेह ठेवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नातेवाईकांची फरफट होत आहे. रविवारी एका मृताच्या नातेवाईकांना शहरातील शवागारात शीतपेटी मिळविण्यासाठी मृतदेह घेऊन सात तास फिरावे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.वसईतील हिम्मत गुलिआना (६४) हे काही कामासाठी डहाणू येथे गेले होते. तेथून परतत असताना रेल्वेगाडीतच गुलिआना यांना हृदयविकाराचा झटका आला होता. इतर प्रवाशांनी आणि रेल्वे पोलिसांनी त्यांना शेजारील खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शवविच्छेदनानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार होते. त्यामुळे त्यांचा मृतदेह शवागारातील शीतपेटीत ठेवण्याचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांनी घेतला होता. मात्र शवागारात शीतपेटी नसल्याने गुलिआना यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून वसई, विरार आणि नालासोपारा येथे नेण्यात आला होता. सात तासांचा प्रवास केल्यानंतर त्यांना नालासोपारा येथे एका खासगी शवागारात जागा मिळाली, पण त्यासाठी दुपटीने पैसे मोजावे लागले आहेत. मृतदेह सोबत घेऊन त्यासाठी शवागार शोधताना मनाला असंख्य यातना होत होत्या. सात तासांची परवड सहन करून आम्हाला शेवटी खासगी रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागला. पालिकेने रुग्णालयात नागरिकांसाठी अशी सोय उपलब्ध करून दिलेली नाही, याची खंत वाटते, अशी व्यथा गुलिआना यांच्या स्नुषा दीपिका यांनी मांडलेली आहे. वसई-विरार महापालिकेचे एकमेव शवागार नवघर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे, मात्र ते काही महिन्यांपासून बंद आहे. विरारमध्ये असलेल्या जिल्हा आरोग्य केंद्रातील शवागारातील शीतपेटय़ांची संख्या मर्यादित आहे. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. शवविच्छेदनही येथेच केले जाते. बेवारस मृतदेहाची तर अक्षरश: विटंबना होते. जागेचा अभाव असल्याने एकावर एक रचून मृतदेह ठेवले जातात.