शरद पवारांच्या दौ-यात चोरांचाही सहभाग, चक्क आमदाराची सोनसाखळी चोरीला
उस्मानाबाद – अतिवृष्टीमुळे निकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांच्या उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा दौरा सुरू असताना दौऱ्यातसोबत असणारे उमरगा-लोहाऱ्याचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी अज्ञात चोरट्यांनी पळविली.
परतीच्या पावसाने उस्मानाबादमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केले आहे. यामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत.
खासदार शरद पवार यांनी सुरुवातीला लोहारा तालुक्यातील सास्तुर गावातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही, केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेऊन भरीव मदत करावी. राज्य सरकारला मदत करण्यासाठी मर्यादा आहेत’ असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. परतीच्या पावसामुळे कधी न भरून येणार नुकसान झाले आहे. या संकटाला खचून न जाता एका धीराने सामना करावा लागेल, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदारांच शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, असंही शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी सकाळी शरद पवार सकाळी हेलिकॉप्टरने तुळजापूर येथे दाखल झाले. खासदार शरद पवार हे उस्मानाबादेत येणार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हेलिपॅडजवळ तोबा गर्दी केली होती.