विरोधकांना चर्चेत कमी वेळ – खरगे यांचा सभापतींवर आरोप
नवी दिल्ली – लोकसभेतील अविश्वास ठरावाच्यानिमीत्ताने होणाऱ्या चर्चेत सभापती सुमित्रा महाजन यांनी विरोधकांना कमी वेळ दिला असून त्यांनी या विषयावरील चर्चेला लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासासारखे स्वरूप दिले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. आमच्या पक्षाला केवळ 32 मिनीटांचा अवधी दिला आहे असे ते म्हणाले हा वेळ आमच्यासाठी अत्यल्प आहे असे ते म्हणाले.
देशात आज शेतकरी, महिला, दलित अशा घटकांवरील अन्यायाची अनेक प्रकरणे आहेत. त्या सर्व विषयांवर सभागृहात चर्चा करण्यासाठी विरोधकांना देण्यात आलेला वेळ अत्यंत अपुरा आहे आणि अन्यायकारक आहे. काहीं पक्षांना केवळ 25 तर काहींना केवळ 15 मिनीटांचा अवधी देण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली. ते म्हणाले की छोट्याछोट्या विधेयकांवरील चर्चेलाही सहा-सात तासांचा वेळ दिला जातो पण सरकारच्या विरोधातील अविश्वास ठरावावरील चर्चेसाठी केवळ सहा तासांचा अवधी देऊन विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे.