विधीमंडळासमोर वॉटरप्रूफ एसी मंडप, पावसाळी अधिवेशन सभागृहाबाहेर घेण्याच्या हालचाली
मुंबई: विधीमंडळाचे सात सप्टेंबरपासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन विधानभवनाबाहेर होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत मंडप उभारुन अधिवेशन घेतले जाण्याची चिन्हं आहेत. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सभागृहाबाहेर अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याबाबतचा प्रस्ताव देखील काल पाठवलेला आहे.
काय आहे प्रस्ताव?
विधान परिषदेचे कामकाज विधानभवनात शारीरिक अंतर राखून करता येऊ शकेल. तर विधानसभेचे कामकाज मात्र सभागृहाच्या बाहेर वॉटरप्रूफ वातानुकूलित मंडप उभारुन त्या ठिकाणी घ्यावे, असा प्रस्ताव आहे. प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला, तर विधानभवनाबाहेर भरलेलं हे इतिहासातील पहिलेच अधिवेशन ठरेल. दरम्यान, विधीमंडळाच्या पार्किंगच्या जागेचाही अधिवेशन स्थळासाठी विचार होत आहे. त्यामुळे वाहन पार्किंगचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यासाठी आजूबाजूच्या काही खासगी व शासकीय इमारतींमधील पार्किंगची जागा तात्पुरत्या स्वरुपात घेण्याचा विचार केला जाऊ शकतोय.
खाजगी कार्यालयामध्ये सध्या 10 टक्केच कर्मचारी उपस्थिती असल्याने जवळच्या बहुमजली इमारतींमध्ये वाहन पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध होऊ शकते. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक 7 ऑगस्टला होणार आहे. त्यात अधिवेशनाच्या आयोजनाची रुपरेषा निश्चित केली जाणार आहे. त्यात मोकळ्या जागेत अधिवेशन आयोजित करण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणार आहे.