विधान परिषद निवडणूकीतून कॉंग्रेसची माघार
- धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा
मुंबई – शिक्षक व पदवीधर अशा चार मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणूकीतून कॉंग्रेसने माघार घेतली आहे. चार जागांच्या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी मित्र पक्षांच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी आज दिली.
महाराष्ट्रामध्ये 25 जून रोजी विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, लोकतांत्रिक जनता दल (शरद यादव गट) यांची बैठक झाली. या बैठकीला सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मताचे विभाजन होऊन याचा फायदा जातीयवादी पक्षांना होऊ नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मित्रपक्षांच्या उमेदवारांना कॉंग्रेस पक्षाने जाहीर पाठींबा दिला आहे.
या चार जागांसाठी कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, मुंबई शिक्षक मतदार संघातून लोकतांत्रिक जनता दलचे कपील पाटील, मुंबई पदवीधर मतदारसंघातून शेकपाचे ऍड. राजेंद्र कोर्डे, तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे संदीप बेडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.