‘विद्यार्थ्यांच्या हिताची बाजू प्रामाणिकपणे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडली,मात्र न्यायालयाच्या निकालाचाही आदर करू’- उदय सामंत
विद्यार्थ्यांच्या हिताची बाजू प्रामाणिकपणे मांडली याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतच महाराष्ट्र सरकारलाही तो निर्णय मान्य करावा लागणार आहे. मात्र त्या आदेशाचं पालन करत असताना एकाही विद्यार्थ्याला कोविड-१९ बाधा होऊ नये यासाठी खबरदारी घेऊन परीक्षा घेण्याबाबत काय फॉर्म्युला आणायचा याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. दरम्यान उदय सामंत स्वत:हा कुलगुरूंची भेट घेऊन कोरोना परिस्थितीत काय खबरदारी घेता येईल याचा आढावाही तो घेणार आहे .
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे या निकालानंतर काय पाऊल उचलायचे, परीक्षा घ्यायच्या तर त्या कशा घ्यायच्या असे विविध प्रश्न आहेत. या सर्वांबाबत मला आता लगेचच भाष्य करता येणार नाही. पण लवकरच राज्य सरकार यासंदर्भातील पुढील निर्णय जाहीर करेल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्यातील पदवीच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताची बाजू प्रामाणिकपणे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडली, याचे समाधान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. विद्यापीठ अनुदान आयोगाला राज्यातील करोना स्थितीबाबत यापूर्वीही कळवले होते. न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले होते.असही उदय सामंत यांनी त्यांच मत व्यक्त केलं आहे.
‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी टीका टिप्पणी करायला सुरूवात केली आहे. सरकार आडवे पडले, उताणी पडले अशा प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे दिल्या जात आहेत. या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचं खच्चीकरण करणाऱ्या आहेत. अशा पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांना मला उत्तर द्यायचे नाही. त्यांनाच त्यांच्या अशा वागणुकीचं उत्तर भविष्यात मिळेल,’ असे उदय सामंत म्हणाले.