विजय मल्ल्याला भारतात न्याय मिळण्याबाबत साशंकता
भारतातील बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर सर्वांच्या नजरा आज ब्रिटनच्या न्यायालयाकडे आहेत. मल्ल्याचे भारतात प्रत्यार्पण होईल किंवा नाही, हे आज निश्चित होणार आहे. सध्या मी बँकांच्या कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनलो आहे. राजकारणाच्या प्रभावामुळे निष्पक्ष सुनावणीबाबत मला भीती वाटत आहे. राजकीय नेते मला एखाद्या नवीन गुन्ह्यात आरोपी बनवतील, अशी भीतीही मल्ल्याने व्यक्त केली आहे.
दरम्यान, विजय मल्ल्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सर्व थकबाकी फेडण्यास तयार असल्याचे सांगितले. मी कर्नाटक उच्च न्यायालयाला आपल्या १४ हजार कोटींच्या संपत्तीची माहिती दिली होती. न्यायालयाच्या निगराणीखाली ही संपत्ती विकली जावी, अशी विनंती मी केली होती. या पैशातून न्यायालय सर्व कर्जदाते आणि कर्मचाऱ्यांची भरपाई करु शकते. माझ्याकडे पुरेसे पैसेही होते, असे मल्ल्याने स्पष्ट केले.
एकीकडे सरकारने बँकांना माझा प्रस्ताव स्वीकारु नये अशा सूचना केल्या होत्या. तर दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाला (इडी) माझी संपत्ती जप्त करण्यास सांगितले होते. मी सरकारी पैशांची चोरी केली आणि देश सोडून पळून गेलो हा आरोप मी फेटाळतो. याउलट किंगफिशर एअरलाइन्स वाचण्यासाठी मी स्वत: ४ हजार कोटी रुपये गुंतवले होते. बँकांनी १०० मूळ रक्कम घ्यावी. जनतेच्या पैशांचे कोणतेही नुकसान होऊ नये. व्याजाबाबत एखाद्या स्वतंत्र न्यायालयाने निर्णय घ्यावा, असेही मल्ल्या म्हणाला.
माध्यमांमुळे मी कर्जबुडव्यांचा पोस्टरबॉय बनलो आहे. राजकारणाने प्रेरित या प्रकरणात निष्पक्ष सुनावणीबाबत मला भीती वाटते. राजकीय नेते मला आणखी एखाद्या नव्या प्रकरणात अडकवतील, असे मल्ल्याने सांगितले.