वारक-यांना देण्यात येणा-या भेटवस्तूंचे भाजपला वावडे
- भेटवस्तू वाटपाची परंपरा होणार खंडीत
- राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांचा आरोप
पिंपरी- मागच्या वर्षी आषाढी वारीतील दिंडीक-यांना दिलेल्या भेटवस्तू खरेदीत सत्ताधा-यांनी भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचार हाच भाजपचा अजेंडा असल्याने यावर्षी वारक-यांना भेटवस्तू न देण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. भेटवस्तू खरेदीत पुन्हा एकदा भ्रष्टाचार होणार असल्याचे भाजप पदाधिका-यांना माहित आहे, म्हणूनच वारक-यांना देण्यात येणा-या भेटवस्तुंचे भाजपला वावडे झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केला आहे.
यासंदर्भात बच्छाव यांनी प्रसिध्दीस पत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना देण्यात येणा-या विठ्ठल-रूक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाल्याचा आव आणून भाजपने राष्ट्रवादीला बदनाम केले. परंतू, त्या आरोपात काहीच तथ्य आढळले नाही. उलट भाजपने गतवर्षी वारक-यांसाठी खरेदी केलेल्या ताडपत्रीत घोटाळा झाल्याचे उघड झाले. भ्रष्टाचार मुक्तीच्या वल्गना करीत सत्तेत आलेल्या भाजपचा मात्र भ्रष्टाचार हाच अजेंडा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावर्षी वारक-यांना कोणतीही भेटवस्तू न देणे म्हणजेच “भाजपला पुन्हा एकदा भ्रष्टाचार होण्याची पक्की खात्री असल्याचा आरोप बच्छाव यांनी केला आहे.
आषाढी वारीतील दिंडी प्रमुखांना देण्यात येणा-या विठ्ठल-रूक्मिणी मूर्ती खरेदीत घोटाळा झाला नसल्याचा निष्कर्ष महापालिका आयुक्तांनी काढला होता. त्यामुळे या प्रकरणात भाजप तोंडघशी पडली. भाजपने जनतेला धार्मिकतेबाबत संवेदनशील करुन खोटे बोलून राष्ट्रवादीची बदनामी केली. उलट गेल्यावर्षी महापालिकेत भाजपची सत्ता येताच पालखीतील दिंडी प्रमुखांना देण्यात येणा-या ताडपत्री खरेदीची जादा दराने निवीदा मंजूर करून सत्ताधा-यांनी भ्रष्टाचार केला. सल्लागार तसेच विवीध निरर्थक बाबींवर लाखो रुपयांची उधळपट्टी करणा-या भाजपला वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा खंडीत करून काय निष्पन्न करायचे आहे? असा प्रश्न बच्छाव यांनी ईमेलद्वारे पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकात उपस्थित केला आहे.