वायुप्रदूषणाने झालेल्या मृत्यूंचा अहवाल मंत्र्यांना अमान्य
भारतात पर्यावरणालाही अच्छे दिन आल्याचा हर्षवर्धन यांचा दावा
भारतात हवा प्रदूषणामुळे २०१७ मध्ये १२ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करणारा जागतिक अहवाल पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला आहे. असे अभ्यास अहवाल हे केवळ घबराट पसरवतात असे त्यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन हे चांदनी चौक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार असून सध्याच्या सरकारमध्ये पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री आहेत.
त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले,की आमचे सरकार प्रदूषणाच्या प्रश्नावर कठोर उपाययोजना करीत आहे. दिल्लीतील आप सरकारला या प्रश्नावर आम्ही सहकार्य केले आहे. प्रदूषणाच्या बाबतीत अच्छे दिन वाढत आहेत व बुरे दिन कमी होत आहेत असा दावा त्यांनी केला.
प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो हे खरे असले तरी बारा लाख लोक त्यामुळे मरण पावले यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अशा अहवालांमधून केवळ घबराट निर्माण करण्यापलीकडे काही साध्य होत नसते. त्या अहवालातील माहितीशी आपण सहमत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
हवा प्रदूषणावर मात करण्यासाठी सरकारने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम सुरू केला असून त्यात १०२ शहरांच्या हवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची साठ पथके ही दिल्ली राजधानी परिसरात पाठवण्यात आली होती. त्यामुळे २०१६,२०१७,२०१८ या काळात प्रदूषण कमी होत गेले आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारलाही केंद्राने प्रदूषण नियंत्रणात मदत केली आहे. सफर हे मोबाईल उपयोजन तयार करण्यात आले असून त्यात शहरांमधील प्रदूषणाची माहिती समजते. सरकारबरोबरच लोकांनी सुद्धा अशा प्रश्नांवर जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे, त्यांनी त्यांच्या वाईट सवयी सोडून ग्रीन गुड डीडसचा अंगीकार करावा. पर्यावरण परवान्यांसाठी आता ‘परिवेश’ हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून त्यामुळे परवान्याचा कालावधी ६०० दिवसांवरून १०० दिवसांपर्यंत खाली आला आहे, असे त्यांनी सांगितले.
अहवालात काय?
ग्रीनपीस या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात असे म्हटले होते,की दिल्ली शहर जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत आहे, त्यानंतर अमेरिकेतील ‘हेल्थ इफेक्टस इन्स्टिटय़ूट’ या संस्थेने त्यांच्या अहवालात असे म्हटले होते,की २०१७ मध्ये भारतात हवाप्रदूषणाने १२ लाख लोक मरण पावले आहेत.