लोडशेडिंग सुरू, तोडफोड-जाळपोळ झाली तर आम्ही जबाबदार नाही-आव्हाड
मुंबई – दिवाळीच्या तोंडावर राज्यावर भारनियमनाचे संकट आहे. चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे. त्यामुळे भारनियमन सुरु झालं आहे. ४०० ते ५०० मेगावॅट वीजेचा तुटवडा आहे. अशात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लोडशेडिंगवरून जाळपोळ-तोडफोड झाल्यास आम्ही जबाबदार नाही असा इशाराच देऊन टाकला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांनी एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते महावितरणच्या अभियंत्याला झापत आहेत असेच दिसते आहे.
वीज नसल्याने कार्यकारी अभियंत्याला फोन केला. पण त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. सतत लोडशेडिंग, लोडशेडिंगच्या वेळांशिवायही लाइट जाण्याचे प्रकार वाढलेत. अशावेळी स्थानिक लोक आम्हाला शिव्या देतात. अधिकारी आमदारांच्या फोनला प्रतिसाद दिला जात नाही. अशात भारनियमानावरून जाळपोळ झाली तर त्याची सुरुवात माझ्या मतदारसंघातून होईल असा इशाराच आव्हाड यांनी दिला. अभियंत्याच्या तोंडाला काळं फासल्यावर त्यांना आमचा फोन ऐकू जाईल असंही ते म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही औरंगाबाद येथील भारनियमनावर टीका केली. औरंगाबाद हे मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर आहे इथे सकाळी साडेसहा वाजल्यापासून वीज नव्हती. मुख्यमंत्र्यांनी भारनियमनमुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा केली होती त्याचे काय झाले? असाही प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.
औरंगाबादमध्ये सकाळी साडेसहापासून वीज नव्हती. मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर असणाऱ्या औरंगाबादची ही अवस्था; खेड्यापाड्यात तर असे अघोषित भारनियमन सुरूच आहे. @CMOMaharashtra तुम्ही महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार होता म्हणे. तुमच्या त्या घोषणेचे काय झाले?
— Supriya Sule (@supriya_sule) October 9, 2018