लोकसभेतील गदारोळाबद्दल सभापती सुमित्रा महाजन यांचे खासदारांना भावनिक पत्र
सभागृह व्यवस्थित चालवणे ही खासदारांची नैतिक जबाबदारी
नवी दिल्ली – गेल्या काही अधिवेशनांमध्ये लोकसभेचे कामकाज गदारोळांमुळे तहकुब होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्व संसद सदस्यांना एक भावनिक पत्र लिहून सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवणे ही प्रत्येक खासदारांची नैतिक जबाबदारी आहे असे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की दुसऱ्या पक्षाच्या खासदारांनी आधी गदारोळ करून कामकाज विस्कळीत केल्याचा दाखला देऊन स्वत: गोंधळ घालून कामकाज विस्कळीत करण्याची प्रथा खासदारांनी थांबवली नाही तर लोकसभेचे कामकाज कधीच सुरळीत चालवले जाऊ शकणार नाही असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
पुढील आठवड्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदारांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की लोकशाहीत संसद हे पवित्र मंदिर आहे. त्याची प्रतिष्ठा जपण्याचे कर्तव्य प्रत्येक खासदाराने जपले पहिजे. ती त्यांची सामुहिक जबाबदारी आहे. आपले लोकप्रतिनिधी संसदेत कसे वागतात याची लोक नोंद ठेवत असतात. प्रत्येक खासदाराचा लोकसभेतील परफॉर्मन्स कसा आहे यांच्या नोंदी ठेवल्या जातात आणि त्याची दखल माध्यमेही घेत असतात. लोकांचा आपल्या प्रतिनिधींवर विश्वास असतो आणि हा विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी खासदारांनीही पार पाडली पाहिजे.
संसदेच्या कामकाजात भाग घेऊन आपल्या मतदार संघातील लोकांच्या व देशाच्या अपेक्षांची पुर्तता करणे तुम्हाला शक्य असते एवढेच नव्हे तर त्याद्वारे तुम्ही लोकशाहीं प्रक्रियेत सक्रिय योगदान देऊन लोकशाही मजबूत करण्याचे काम करीत असता. ही बाब लक्षात ठेऊन संसदेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडणे ही प्रत्येकाचीच जबबादारी आहे. ती जबाबदारी या अधिवेशनात पार पाडली जाईल अशी अपेक्षा सुमित्रा महाजन यांनी या पत्रात व्यक्त केली आह.