लोकसभा निवडणुकीत भाजप बरोबर जाणार नाही – टीआरएस
हैदराबाद– आगामी लोकसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्रीय समिती हा पक्ष भाजपबरोबर जाणार नाही तो विषयच आमच्यापुढे उपस्थित होत नाही असे या पक्षाचे नेते व तेलंगणातील एक मंत्री के. टी. रामाराव यांनी म्हटले आहे. रामाराव हे विद्ममान काळजीवाहू मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे चिरंजीव आहेत. कॉंग्रेसने राज्यात तेलगु देसम आणि अन्य पक्षांना एकत्र आणून जे महागठबंधन योजले आहे तेही घटीया बंधन आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.
गुरूवारी ट्विटर अकौंटवरून त्यांनी ही टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की आमचा पक्ष हा पुर्ण सेक्युलर पक्ष आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. समाजात धर्म आणि जातीच्या नावाने धृवीकरण करण्याचे प्रयत्न आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे आम्ही भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अनेक विषयांवर त्यांचे आणि आमचे अत्यंत परस्पर विरोधी विचार आहेत त्यामुळे त्यांच्याशी आमचे कदापिही सूर जुळणार नाहींत.
कॉंग्रेस व तेलगु देसम पक्षांनी राज्यातील जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात पुन्हा आम्हालाच बहुमत मिळेल असा आमचा ठाम विश्वास आहे त्याच आधारावर आम्ही विधानसभा अधिच विसर्जित केली आहे असा दावाही त्यांनी केला. राज्य सरकारी सेवांमध्ये आम्ही चाळीस हजार युवकांना रोजगार दिला आहे अशी माहितीही त्यांनी दिली.