लडाखमध्ये भारतीय जवानांना पेट्रोलिंग करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
कोरोना काळात संसदेच्या पहिल्या अधिवेशनाचा (पावसाळी) आज चौथा दिवस आहे. चीन वादावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही आज राज्यसभेत विधान केले. ते म्हणाले, “जगातील कोणतीही शक्ती भारतीय जवानांना लडाखमध्ये पेट्रोलिंग करण्यापासून रोखू शकत नाही. चीनच्या सीमेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. चीनने बातचीत दरम्यान 29-30 ऑगस्ट रोजी लडाखमध्ये चिथावणीखोर कारवाई केली. त्यांच्या शब्दात आणि कृतीत फरक आहे. “
- चीनने करार मोडले
राजनाथ म्हणाले, “चीनची मनोवृत्ती दर्शवते की ते दोन्ही देशांच्या कराराचा आदर करत नाही. चिनी सैन्याने 1993 आणि 1996 चा करार मोडला. सीमेवर शांतता कायम ठेवण्यासाठी एलएसीचा सन्मान करणे आवश्यक आहे. “
- लडाखच्या 38 हजार चौरस किमी क्षेत्रावर चीनचा अवैध कब्जा
“चीनने अवैधरित्या लडाखमधील 38 हजार चौरस किमी क्षेत्रावर कब्जा जमवला आहे. चीन-पाकिस्तान 1963 च्या कथित करारांतर्गत पाकिस्तानने व्याप्त काश्मीर (पीओके) मधील 5,182 चौरस किलोमीटर जमीन चीनला दिली आहे. यासोबतच अरुणाचलला लागून असलेल्या 90 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावरही चीन दावा करत आहे. “
- चीनने सीमेजवळ कंस्ट्रक्शन वाढवले
“चीन गेल्या अनेक दशकांपासून सीमावर्ती भागात सैन्याच्या तैनाती वाढवत आहे. यासोबतच बांधकामांच्या कामांमध्येही वाढ झाली आहे. केंद्र सरकारनेसुद्धा सीमांमधील पायाभूत सुविधांच्या विकासाचे बजेट दुप्पट केले आहे.”
- चीनमुळे युद्धजन्य परिस्थ्ती तयार झाली
”आम्ही चीनच्या कोणत्याही कृतीला प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहोत. कोणत्याही आव्हानापासून मागे हटणार नाही. चीनच्या कृतींमुळे गलवान घाटीमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. आम्हाला शांतता हवी आहे, परंतु देशाचे संरक्षण करण्यास मागे हटणार नाही. मी 130 कोटी देशवासियांना आश्वासन देतो की ते देशाची मान खाली जाऊ देणार नाही.”
- प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे
“वादाचे मुद्दे आणि सैन्याच्या संख्येबाबत यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. आम्हाला सद्य परिस्थिती शांततेत सोडवायची आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत.”