लग्न कधी होणार माहित नाही – वरुण धवन
बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाच्या न्यूजचा भडिमार होतो आहे. रणबीर- आलिया, रणवीर- दीपिका आणि प्रियांका- नीकच्या लग्नाच्या तयारीच्या बातम्या सातत्याने येत असतात. दुसरीकडे वरुण धवनही लग्नाच्या तयारीला लागलेला दिसतो आहे. लहानपणची मैत्रिण नताशा दलालबरोबर लग्न करण्यासाठी वरुणने आपली मानसिक तयारी पूर्ण केली आहे.
नताशाबरोबरच्या त्याच्या विशेष मैत्रीच्या बातम्या आल्या होत्या. मात्र त्याबाबत वरुणने काही खास सांगितले नव्हते. मात्र आता तो मोकळेपणाने बोलू लागला आहे. नताशा आपल्या आयुष्यात आल्यामुळे आपल्यामध्ये खूप सकारात्मक बदल झाला असल्याचे तो म्हणाला.
नताशाला जरा हटके रोल अधिक पसंत आहेत, त्यामुळेच आपण “बदलापूर’ आणि “ऑक्टोबर’सारखे सिनेमे करण्याचा निर्णय घेतला. नताशाला आपण खूप दीर्घ काळापासून ओळखत आहोत, त्यामुळे आपल्यातील नाते खूप घट्ट आहे. पण असे असूनही नताशाबरोबर लग्न करण्यामध्ये एक अडथळा आहे.
तो म्हणजे आपण एक कलाकार असल्याचेही वरुणने सांगितले. स्वतः मात्र लग्नाला तयार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. मात्र तो अभिनेता असल्याबद्दल नताशाला आक्षेप का वाटतो आहे, याचे मात्र तो समर्पक कारण सांगू शकला नाही. सरतेशेवटी हे लग्न नक्की कधी होईल हे आपल्यालाही सांगता येणार नाही, असे तो म्हणाला.