रेशनिंग दुकाने सकाळी चार आणि दुपारी चार तास चालविण्यास परवानगी द्या
- माजी खासदार गजानन बाबर यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील रास्त भाव रेशनिंग दुकाने सकाळी चार तास व दुपारनंतर चार तास चालू ठेवण्यात यावीत, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात बाबर यांनी ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील रास्त भाव रेशनिंग दुकानदारांना सकाळी चार तास व दुपारनंतर चार तास धान्य वितरण करण्याकरता मुभा देण्यात यावी. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा, आत्मनिर्भर योजना तसेच केशरी कार्डधारकांना धान्यपुरवठा रेशनिंग दुकानदारा मार्फत केला जातो. तो वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचणे या कोरोना महामारीच्या परिस्थितीत गरजेचे आहे. जेणेकरून कोणताही नागरिक धान्यापासून वंचित राहणार नाही. कोणत्याही नागरिकाची उपासमार होणार नाही.
रास्त भाव रेशनिंग दुकानदार शासनाने दिलेली जबाबदारीचे पालन करण्यात सक्षम आहेत. परंतु, त्यांना वरील विषयाप्रमाणे सकाळी चार तास व दुपारनंतर चार तास धान्य वितरण करण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून केंद्र शासन व राज्य सरकारकडून येणारे धान्य योग्य वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचेल. कोणत्याही रास्त भाव दुकानदाराची तक्रार होणार नाही. तरी आपण यावर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.