राष्ट्रवादीचे तळमळे ‘मन’, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे भाजपचे ‘ना-लक्ष-ना-मन’
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवच्या राजकारणाला वेगवेगळे वळण मिळू लागले आहे. आजपर्यंत नागरिकांच्या प्रश्नांवर शांत राहिलेल्या राष्ट्रवादीकडून सत्ताधारी भाजपवर सोशल मीडियातून प्रश्नांचा भडीमार होताना दिसत आहे. सर्वसामान्यांना भेडसावणा-या प्रश्नांवरून राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांनी समाजमाध्यमावर भाजपच्या नेत्यांचे वाभाडे काढले आहे. “स्वतःच्या भल्यासाठी पक्षांतर केले, जनतेसाठी काय केले”, असा कठोर प्रश्न काटे यांनी विचारला आहे. शेवटी “ना-लक्ष-ना-मन, त्रस्त जनता जनार्दन” असा वाक्याला यमक देऊन भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर निशाना साधला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट जोरात व्हायरल होत आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या पक्षांतरावर नाना काटे यांनी उपहासात्मक प्रश्न केला आहे. सोशल माध्यमातून त्यांनी हा हल्ला केला आहे. काटे यांनी उपस्थित केलेला प्रश्न रास्त वाटतो. परंतु, त्यांनी इतके दिवस जगताप यांच्या विरोधात एकही शब्द न काढता आताच कसे काय व्यक्त झाले?, असेही अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तथापि, जगतापांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये केलेले पक्षांतर स्वार्थासाठी असल्याचेही काटे यांनी स्पष्ट म्हटले आहे. नेत्याची छबी आणि गळ्यात भाजपचे चिन्ह असलेले उपरणे टाकलेले दाखवून काटे यांनी सोशल मीडियावरील आपल्या समर्थकांना संबोधित केले आहे. खाली स्वतःच्या भल्यासाठी पक्षांतर केले, जनतेसाठी काय केले? असेही नमूद आहे. इमेजच्या डाव्या बाजुला ना-लक्ष-ना-मन त्रस्त जनता जनार्धन, असाही शब्दप्रयोग केलेला आहे.