राम मंदिर रखडल्यामुळे भाजपाचा पराभव : व्हीएचपी
छत्तीसगड आणि राजस्थानसह पाच राज्यांमध्ये भाजपाचा झालेला पराभव राम मंदिर निर्माणाचे कार्य रखडल्याचा परिणाम आहे असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलं आहे. भाजपाकडे अद्यापही वेळ आहे, त्यांनी चूक सुधारावी असा सल्लाही विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला आहे.
पाच राज्यांच्या निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सल्लागार पुरुषोत्तम नारायण सिंह म्हणाले की, अयोध्येत राम मंदिराचं निर्माण कार्य रखडल्यामुळे रामभक्तांनी राम मंदिराचा मुद्दा जाहीरनाम्यात सर्वात वर असणाऱ्या पक्षाला पक्षाला नाकारले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे तोडगा लवकर काढावा. राम मंदिर हा मुद्दा हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्याशी जोडलेला आहे.
छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यांचा राम मंदिर आंदोलनातील मोठा सहभाग होता. येथूनच आंदोलनाने व्यापक रूप धारण केले होते आणि याच आंदोलनादरम्यान तिन्ही राज्यांत भाजपाचे पूर्ण बहुमतातले सरकार विराजमान झाले होते. आजचे निवडणूक निकाल म्हणजे काँग्रेसचा विजय नाही तर रामभक्तांचा काही काळाकरीता झालेला मोहभंग आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपाने राम मंदिराच्या निर्माणाबाबत जनतेच्या भावनांचा आदर ठेवावा आणि पुढील निवडणुकीतील निकाल आपल्या बाजूने करावेत. आतातरी बोध घ्या आणि चूक सुधारा, असा सल्ला सिंह यांनी भाजपाला दिला.