राम कदमांना कोणीही उमेदवारी देऊ नये – उद्धव ठाकरे
मुंबई – राम कदमांना कुणीही उमेदवारी देऊ नये, माता-भगिनींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) केली.
पत्रकार परिषदेत राम कदम यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, ‘भाजपने बेटी भगाओ कार्यक्रम सुरू केला आहे का? माता-भगिनींचा अपमान सहन करणार नाही. राम कदमांना कोणीही उमेदवारी देऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम कदम यांच्यावर धाडसाने कारवाई करून तातडीने राजीनामा घ्यावा.’
पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी हार्दिक पटेलला फोन केला असल्याचे ठाकरे यांनी सांगून ते म्हणाले, ‘गुजरातमध्ये आरक्षणासाठी हार्दिक पटेल गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसला आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे. गुजरातमधील भाजप सरकारने हा मुद्दा फार ताणू नये.’
‘तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा. मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी सोमवारी (ता. 3) घाटकोपर येथे दहीहंडीमध्ये म्हटले होते. राम कदम यांनी मुक्ताफळं उधळल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे.