राज ठाकरे यांची अवस्था ‘मान ना मान मै तेरा मेहमान’- मुख्यमंत्री
राज ठाकरे ९ सभा घेणार आहेत, ते आमच्या विरोधात प्रचार करणार आहेत. मात्र त्यांची अवस्था दुर्दैवी आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले आहे. राज ठाकरे यांच्यासोबत गेलेली मंडळी मनाने हिंदुत्त्ववादी आहेत. त्यामुळे त्यांचा उरलासुरला मतदारही त्यांना सोडून देणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यांची सध्याची अवस्था मान ना मान मै तेरा मेहमान अशी झाली आहे या अवस्थेचं मला दुर्दैव वाटतं असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
त्यांच्यासोबत असलेले अनेकजण मनाने शिवसेना आणि भाजपाचे मतदार आहेत. त्यावेळेस राज ठाकरे हे एक मोठं नेतृत्त्व होईल असं वाटल्याने हे लोक त्यांच्यासोबत गेले. फार राहिले नाही, राज ठाकरेंनी कितीही सभा घेतल्या तरीही त्यांचा मतदार, म्हणजेच मनसेचा जो काही उरलासुरला मतदार असेल हा मतदार त्यांच्यापासून तुटेल. राज ठाकरे जेवढ्या ताकदीने भाजपा आणि सेनेविरोधात बोलतील तेवढ्या ताकदीने त्यांचा मतदार भाजपा सेनेकडे वळेल असं मला वाटतं असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांच्या मतदारांना मोदी हवे आहेत हे सत्य आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
आमच्यासाठी सर्वात मोठा फायदा हा आहे की काँग्रेस पक्ष यामुळे उघडा पडला. काँग्रेस राष्ट्रवादीने मनसेला आघाडीत घेतलं नाही. का घेतलं नाही? कारण आघाडीत घेतलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी, बिहार उत्तर प्रदेशमध्ये काय उत्तर देणार? राज ठाकरेंची अवस्था मान ना मान मै तेरा मेहमान अशी झाली आहे याचं मला दुर्दैव वाटतं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
एक तरूण नेता, लोकांशी संवाद साधू शकेल असा नेता अशी राज ठाकरेंची ओळख आहे. मात्र आत्ता ते जे काही करत आहेत त्यामुळे ते स्वतःचं महत्त्व कमी करून घेत आहेत. राज ठाकरेंच्या सभांना लोक गर्दी करतात पण ते मोदीविरोधी भूमिका घेतील तेवढे त्यांच्या पक्षातले मतदार आम्हाला मत देतील. राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत फार टीका मी करणार नाही पण त्यांची अवस्था दुर्दैवी आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.