“राज ठाकरेंचा चेहरा होता नवा, म्हणून काही दिवस टिकली त्यांची हवा”, रामदास आठवलेंनी उडवली खिल्ली
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सत्तेसाठी मते न मागता विरोधी पक्ष होण्यासाठी मते मागितली ते चांगले झाले, मात्र मनसेची स्पर्धा काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असल्याने मनसेला राज्यात विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा सुद्धा मिळणार नाही असे सांगत राज ठाकरेंचा चेहरा होता नवा म्हणून काही दिवस टिकली त्यांची हवा असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावला आहे. विलेपार्ले येथील आंबेडकर नगरमध्ये भाजपा-शिवसेना-रिपाइं महायुतीचे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अॅड.पराग आळवणी यांच्या जाहीर प्रचारसभेत रामदास आठवले बोलत होते.
“महायुतीमध्ये रिपाइंला सहा जागा देण्यात येणार होत्या पण केवळ पाच जागा आम्हाला दिल्या आहेत. आम्हाला किती जागा दिल्या यापेक्षा महायुतीला विजयी करणे हे रिपाइंसाठी महत्त्वाचे आहे. रिपाइं स्वतंत्र पक्ष आहे. निवडणूक जिंकण्यासाठी कमळ निशाणी आम्ही घेतली आहे. आम्ही घेतले कमळ पण तुमच्या पोटात का होते मळमळ? माझ्या हाती आहे झेंडा निळा का तुमच्या पोटात उठतो गोळा ?,” अशी कविता करून विरोधकांना रामदास आठवले यांनी सवाल केला.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, आरपीआयचे पाच उमेदवार कमळ निशाणीवर जरी निवडून आले तरी त्यांना रिपाइंचे आमदार म्हणून वेगळा गट नोंदणी करून विधिमंडळात वेगळे कार्यालय देण्यात येईल,” असं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं.