राज्य सरकारला कृषी क्षेत्राचा विसर – विखे
- कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन
सामाजिक बांधीलकीतून कृषि विज्ञान केंद्राचे काम दिशादर्शक आहे, शेतकऱ्यांना शेती करताना मोठया समस्या आहेत. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे, पण या
राज्य सरकारमध्ये कृषी खाते आहे की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून कृषी योजना बंद पडल्या आहेत, अनुदान वेळेवर येत नाही, त्यामुळे राज्य सरकार कृषी क्षेत्राला विसरले आहे का असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित केला.
तालुक्यातील बाभळेश्वर येथे कृषी विज्ञान केंद्र(पायरेन्स), आत्मा, पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकाऱ्याने आयोजित तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन विखे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे, बारामती कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, नाबार्डचे शिलकुमार जगताप, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, शेती व्यवसायासमोर हवामान बदलाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांनी कृषी विज्ञान केंद्र सुरू करताना शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि हवामान बदल यासाठी केंद्राची मदत होईल हा विचार केला होता. या केंद्राने चांगले काम करताना नीती आयोगाचे अ मानांकन मिळवले आहे. महिला बचत गटांना उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ प्रदर्शनातून उपलब्ध व्हायला हवी. त्यासाठी केंद्राने मदत केली पाहिजे, मुरघास उत्पादनासाठी मदत करावी.
परतीचा पाऊस पडला नाही. खरीप हंगाम वाया गेला. सरकार सहकाऱ्याची भूमिका घेत नाही. घोषणांची अंमलबजावणी होत नाही. दूध दर वाढ, कर्जमाफी या फक्त घोषणाच ठरल्या आहेत. धरणांमध्ये पाणी आहे पण शेतकऱ्यांना ते मिळेलच याची खात्री वाटत नाही. समन्यायी पाणी वाटप कायद्याची टांगती तलवार आहे. शेतकरी सर्व बाजूनी अडचणीत सापडला आहे, याकडे विखे यांनी लक्ष वेधले. राजेंद्र पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विखे यांच्या कार्याचे कौतुक केले. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांचे भाषण झाले. या वेळी आदर्श शेतकरी,बचत गट, शेतकरी गट, उत्पादक गट यांचा सन्मान करण्यात आला. डॉ.संभाजी नालकर यांनी प्रास्ताविक तर सनी बोरुडे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. कृषी महोत्सवात विक्री स्टॉल, कृषी प्रदशर्न, परिसंवाद, शिवारफेरी, पीक महोत्सव, शेतकरी मेळावा यांचे तीन दिवस आयोजन कारण्यात आले आहे.