अतिवृष्टीमुळे राज्यात ९० लाख हेक्टर पिकांच्या नुकसानीचा सुधारित अंदाज
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे क्षेत्र ९० लाख हेक्टरपर्यंत वाढण्याचा सुधारित अंदाज कृषी विभागातील सूत्रांनी वर्तविला आहे. सत्तास्थापनेचा घोळ व केंद्र सरकारकडून मदत मिळण्यासाठी पार पाडावी लागणारी प्रक्रिया यामुळे नुकसानभरपाई मिळण्यासाठी नवीन वर्ष (२०२०) उजाडण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यपाल कार्यालयाकडून वेगाने सूत्र हलल्यास मदतनिधी लवकर मिळू शकेल, अशी आशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
राज्यातील पिकांचे तब्बल साडेतीन ते चार हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात ऊस पीक वगळून १४० लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी १३८.७३ लाख हेक्टरवर (९९ टक्के) सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत पेरणी-लागवडीची कामे झाली होती.ऊस पीक धरून सरासरी क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर असून, १३९.८८ लाख हेक्टरवरील (९३ टक्के) पेरणी-लागवडीची कामे सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत झाली होती. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात
पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ४ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. आॅक्टोबरमध्ये लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसानीची तीव्रता वाढली आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक पाहणीत राज्यात तब्बल ५४ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे समोर आले होते.