राज्यात २४ तासांत थंडीचा कडाका वाढणार
मुंबई – राज्यात दिवाळीनंतर तापमानात घट झाली असून गुलाबी थंडीस सुरुवात झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे. अशातच बंगालच्या उपसागरातील बुरेवी वादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्यामुळे थंडीचा जोर आणखी वाढणार, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आवश्य वाचा:- शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा
मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात चांगलीच घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर यांसह इतर अनेक जिल्ह्यांत किमान सरासरी तापमानात कमालीची घट झाली आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 10 अंशावर घसरल्याने पहाटे हवेत गारवा जाणवू लागला आहे. त्यातच आता पुढच्या 24 तासांत तापमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
मुंबईतही तापमानाचा पारा घसरला असून सांताक्रुझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे मुंबईतील यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. तसेच शनिवारी राज्यात सगळ्यात कमी किमान तापमान 10.5 अंश सेल्सिअस गोंदियात नोंदवण्यात आले आहे. तर नागपुरात किमान तापमान 12 अंश सेल्शिअसवर पोहोचले आहे.
आवश्य वाचा:- CBSE Board Exams: जानेवारीत परीक्षा होण्याची शक्यता