शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा
नवी दिल्ली – देशभरातील शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश होत असतानाही सरकार नवे कृषी कायदे मागे घेत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेसने अधिकृतरित्या पाठिंबा दर्शवला असून भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णयही घेतला आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी ही माहिती दिली.
आवश्य वाचा :- कृषी कायद्याबाबत शहाणपणाची भूमिका घ्या, शरद पवारांचा केंद्र सरकारला सल्ला
खेडा म्हणाले, ‘8 तारखेला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचे समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी टाकलेलं हे मजबूत पाऊल असेल. भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होवो यासाठी आम्ही प्रयत्न करू.’
दरम्यान, कडाक्याच्या थंडीत गेल्या १० दिवसांपासून दिल्लीत हजारो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शनिवारी पुन्हा एकदा सरकारसोबत चर्चा निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र भावना आहेत. आज सकाळपासून शेतकरी दिल्लीच्या सिंघु, टीकरी, दिल्ली गाजियाबाद, चिल्ला आणि इतर सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. दिल्लीच्या सीमांवर असलेल्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणाच केली आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे फिरणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
आवश्य वाचा :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमित शहांनी केले अभिवादन