राज्यात तीन पक्षांचे सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना : रावसाहेब दानवे
अहमदनगर | केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडीवर सडकून टीका केली आहे. राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. कोण निर्णय घेतंय, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही, असं म्हणत त्यांनी आघाडीवर निशाणा साधला. यावेली त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षेवरही भाष्य केलं. या विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा न घेता त्यांना श्रेणी दिल्यास या विद्यार्थ्यांना कोविड विद्यार्थी असा शिक्का बसेल, असाही दावा रावसाहेब दानवे यांनी केला. ते अहमदनगर येथे आयोजित भाजप कारखानदारांच्या बैठकीसाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
रावसाहेब दानवे म्हणाले, “राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. कोण निर्णय घेतंय, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील केले जात नाही असं म्हटलं. याचाच अर्थ राज्य सरकारमध्ये समन्वय नाही.” यावेळी दानवे यांनी देशातील अन्नधान्याच्या साठ्याबाबतही माहिती दिली. आपल्या देशात जवळपास 2 वर्षे पुरेल इतकं धान्य आहे. त्यामुळे भविष्यात देखील आपल्या देशात अन्नधान्याची टंचाई येणार नाही, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
राज्य सरकार आता कोरोना रुग्णांकडे दुर्लक्ष करत आहे. आधी राज्यात कोरोना रुग्ण आढळल्यास त्यांना तात्काळ वेगळं करुन त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांच्या कोरोना चाचणी केल्या जायच्या. मात्र, आता केवळ त्या रुग्णाची चाचणी होते आणि त्यांना घरीच क्वारंटाईन केलं जातं. त्यामुळेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला. राज्य सरकार कोरोना रुग्णांची योग्य काळजी घेत नाही. राज्य सरकारचे कोरोना समोर हात टेकले आहेच, असाही आरोप दानवे यांनी केला.