अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या प्रेमसंबंधाबद्दल सर्वांनाच कल्पना आहे. 2017 पासून एकत्र असणाऱ्या या सेलिब्रिटी जोडीच्या विवाहबंधनाच्या चर्चा नेहमी होत असतात.
काही दिवसांपूर्वीच रणबीरनं एका मुलाखतीदरम्यान त्याच्या आलियासोबच्या लग्नाबाबत लक्षवेधी वक्तव्य केलं होतं. कोरोना महमारीचं संकट नसतं तर एव्हाना आम्ही विवाहबंधनात अडकलो असतो, असं तो म्हणाला होता. आता नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ही जोडी राजस्थानच्या दिशेनं रवाना झाल्याचं म्हटलं गेलं.
रणबीर आणि आलियाचे कुटुंबीय जयपूरला पोहोचले आहेत. शिवाय रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हेसुद्धा सध्या तिथंच आहेत. इतकंच नव्हे तर, रणबीरचा खूप चांगला मित्र दिग्दर्शक अयान मुखर्जी ही जयपूरमध्येच आहे. यात भर म्हणजे सध्या गोव्यात असणारा करण जोहरही त्याच दिशेनं रवाना होणार असल्याच म्हटलं जात आहे.
रणथंबोरमधील अमन हॉटेल येथे ही मंडळी थांबली असल्याची माहिती समोर येत आहे. सरत्या वर्षाच्या दिवसांत त्यांचं राजस्थानमध्ये जाणं हे नववर्षाच्या स्वागतासाठी असल्याचं म्हटलं गेलं. पण निकटवर्तीय, मित्रपरिवार यांची उपस्थिती ही या सेलिब्रिटी जोडीच्या साखरपुड्याबाबतच विचार करायला चाहत्यांना भाग पाडत आहे.
‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानंतर रणबीर आणि आलिया 30 डिसेंबरला साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.