रक्तचंदन तस्करी तपासात ३० जणांचे दूरध्वनी टॅप
लोकसभा निवडणुकीनंतर बंगळूरु पोलिसांनी कर्नाटकमधून होणारी रक्तचंदनाची तस्करी थांबविल्याचा दावा केला. या प्रकरणी १३ जणांना अटकही करण्यात आली आणि चार कोटी रुपये किमतीचे चार हजार किलो रक्तचंदन पकडले. मात्र या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान बंगळूरु पोलिसांनी राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील अनेकांचे दूरध्वनी टॅप केल्याची बाब उघड झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ३० जणांचे दूरध्वनी टॅप करण्यात आले. इतकेच नव्हे तर कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचे सरकार बंडखोर आमदारांनी उलथून टाकले, तेव्हाही बेकायदेशीरपणे दूरध्वनी टॅप करण्यात आले होते. ज्या ३० जणांचे दूरध्वनी टॅप करण्यात आले त्यामध्ये वोक्कलिंग समाजाचे प्रभावशाली मठाधिपती निर्मलानंद स्वामी आणि लोकसभा निवडणुकीतील किमान एक उमेदवार आणि सहकारी यांचा समावेश आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा सरकारने बेकायदेशीर दूरध्वनी टॅपिंगचे प्रकरण (ऑगस्ट २०१८ ते ऑगस्ट २०१९) म्हणजेच कुमारस्वामी यांच्या कालावधीतील आणि येडियुरप्पांचा कालावधी सुरू होण्याच्या काळातील टॅपिंगची चौकशी सीबीआयकडे सुपूर्द करीत असल्याचे जाहीर केले. बंगळूरु पोलिसांनी अनेक महिन्यांपासून रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्यांवर पाळत ठेवली होती. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्रातून चीन आणि अतिपूर्वेकडील देशांमध्ये तस्करी केली जात होती.रक्तचंदनाच्या तस्करीमध्ये अनेक जणांचा सहभाग असून त्याची नियमितपणे चौकशी केली जात होती, संशयितांचे दूरध्वनी कायदेशीरपणे टॅप केले जात होते, इतरांचे दूरध्वनी टॅप करण्याची मागणी केली जात होती. ते क्रमांक संशयितांच्या क्रमांकासमवेत टाकण्यात आले आणि तेही टॅप करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.