‘या’ विद्यापीठाने चार हजार विद्यार्थ्यांना विनापरीक्षा दिल्या पदव्या
जम्मू, जम्मूकाश्मीरातील कठुआ येथे असलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या म्हणजेच इग्नोयुच्या एका केंद्रातील घोटाळा क्राईम ब्रॅंचने उघडकीला आणला आहे. तेथील केंद्रान सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना परिक्षा न देताच त्यांना पदव्या बहाल केल्या असल्याचे उघडकीला आले आहे. पोलिसांनी सांगितले की या केंद्रात चार हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे दाखवण्यात आले असून त्यांनी परिक्षाही दिल्या असल्याची नोंद करण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात त्यांच्या कोणत्याही परिक्षा न घेताच त्यांना विविध शाखांच्या पदव्या देण्यात आल्या आहेत. या केंद्रात दर वर्षी जानेवारी आणि जुलै अशा दोन महिन्यांमध्ये दोन वेळेला प्रवेश दिले जातात आणि त्या विद्यार्थ्यांच्या जून आणि डिसेंबर मध्ये परिक्षा घेतल्या जातात. प्रत्येक सत्रात सुमारे आठशे ते बाराशे विद्यार्थी या केंद्रात प्रवेश घेत असतात.
या केंद्रात विद्यार्थ्यांची बोगस हजेरी पत्रके आणि बोगस उत्तर पत्रिका तयार करून त्यांनी कटरा, किश्तवार, चित्रू आणि पद्दर उपकेंद्रांतून परिक्षा दिल्याचे दाखवले गेले आहे. विद्यार्थ्यांकडून हजारो रूपये उकळून त्यांना अशा पद्धतीने येथून बोगस पदव्या दिल्या गेल्याची बाब तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस अधिक तपास करीत असून या प्रकरणात अनेक जण अडकले असल्याचे लक्षात येत आहे.