‘या’ एकाच ग्रामपंचायतीचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमधील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. यातच आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ओळखल्या जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराच दिला आहे. 30 डिसेंबर 2020 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
अकलूज ग्रामपंचायतीचा नगरपालिकेमध्ये रुपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. मात्र आता तेथे ग्रामपंचायतीची निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये करावं, अन्यथा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू असा, असा इशारा येथील ग्रामस्थांनी आता दिला आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायती ग्रामस्थांना नागरी सुविधा देण्यास अपुर्या पडत आहे, त्यामुळे नगरपंचायतमध्ये त्याचे रुपांतर करावे यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. सप्टेंबर 2019 मध्ये त्या पद्धतीचा प्रस्ताव देखील शासन स्तरावर काढण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करूनच येथील निवडणूक प्रक्रिया पार पाडावी अन्यथा ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी बैठकीत घेतला आहे.