म्हणून रद्द केला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आज दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार होता. मात्र कार्यक्रम रद्द झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आंबेडकर चळवळीतील नेत्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण न दिल्याने वाद निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलंय. तसेच, याप्रकरणी कुणीही राजकारण करू नये, असा टोलाही लगावला.
मुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला केवळ १६ जणांनाच आमंत्रण दिले गेले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी हे उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमासाठी केवळ 16 जणांना बोलवण्यात आले होते, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील कोणालाही आमंत्रित न केल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. इतकचं नाही तर राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यातही नाराजी निर्माण झाली आहे.
पायाभरणी कार्याक्रमासाठी कोणाला बोलवायचं हा सर्वस्वी निर्णय सरकारचा असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. तर, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी निमंत्रण न दिल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज सकाळी १० वाजता आनंदराज आंबेडकर यांना एमएमआरडीए निमंत्रण दिलं. इंदू मिलच्या आंदोलनपासून प्रत्येक कार्यक्रमात आमचा सहभाग होता. त्यानंतर या स्मारकातील निकृष्ट बांधकामाबाबत आवाज उठवला होता, त्यामुळे निमंत्रण देण्यात आलं नाही, या संपूर्ण कामाची गुणवत्ता सरकारने तपासावी असं आनंदराज आंबेडकरांनी मागणी केली आहे.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी अजितदादा पुण्याहून मुंबईसाठी येत होते. दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार होता. मात्र अचानक हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती MMRDA ने दिली. त्यामुळे वाशीपर्यंत पोहचलेले अजित पवार पुन्हा यु-टर्न घेत पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान आता आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत हा कार्यक्रम करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.